जन्म.२९ जून सोलापूर येथे.
सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, विनोदी आणि संगीतप्रधान अशा विविध प्रकारच्या नाटकांतून आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. गजल, ठुमरी, लावणी आणि नाट्यसंगीत असा गायनाचा मोठा आवाका असणाऱ्या फय्याज यांनी गेली अनेक वर्षे आपला वेगळा ठसा उमटवला आहे. फय्याज शेख या मूळच्या सोलापूरच्या. एका साध्या मुस्लिम घरात त्या जन्मल्या, वाढल्या. घरात वातावरण नसतानाही त्यांना नृत्य आणि संगीताची उपजतच आवड होती. विशेष म्हणजे, फय्याजना अगदी लहानपणापासून त्याची जाणीवही होती. शाळेत असतानाच त्यांनी मास्टर हसन यांच्याकडे कथक आणि गुरू कटिबद्ध यांच्याकडे भरतनाट्यमचे शिक्षण घ्यायला सुरवात केली. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याची आणि ते जबाबदारीने पेलण्याची सवय त्यांना लागली ती अशा लहान वयातच. त्यांच्या अंगच्या कलांच्या आविष्काराची संधीही त्यांना लहानपणापासूनच मिळत गेली. त्यावेळी त्या सोलापुरातल्याच छोट्या मेळ्यांतून काम करायच्या. मॅट्रिकच्या वर्षी अभ्यासाला प्राधान्य देऊन त्यांनी कलाराधना थांबवली; पण त्यांचा मूळ ओढा होता तो कलेकडेच आणि याच क्षेत्रात आपण काम करणार आहोत, हे जणू त्यांनी लहानपणीच ठरवूनही टाकले होते. त्यामुळे आज ना उद्या सोलापुरातून बाहेर पडायचे आणि मुंबईला जायचे, याची खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. फय्याज १९६५ साली मुंबईत आल्या तेव्हा आपल्या कलेला मुंबईतच वाव मिळू शकेल, असा होरा तर होताच; पण त्याचबरोबर कुटुंबासाठी पैसे कमावण्याची जबाबदारीही त्यांच्यावर होती. मात्र, काम करायचे ते मनाला पटले तरच, हा पीळ मात्र फार लहानपणापासूनच त्यांच्या अंगी होता. त्यामुळे पैसे कमवण्यासाठी कोणतेही काम करायची त्यांची तयारी नव्हती. मुंबईत दाखल झाल्यावर लवकरच त्यांना “गीत गायिले आसवांनी’ या नाटकात पहिले काम मिळाले. त्यात फय्याज यांनी एका मुस्लिम मुलीचीच भूमिका रंगवली होती. फय्याज यांचे हे पहिलेच नाटक खूप गाजले. प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि भावगर्भ आवाज यामुळे पहिल्याच नाटकात त्यांची विशेष दखल घेतली गेली. नाट्यसृष्टीत फय्याज यांचा प्रवेश झाला आणि पहिल्याच नाटकात हे वेगळे पाणी आहे, हेदेखील जणू त्यांच्या क्षेत्रातील मंडळींच्या लक्षात आले. त्याच वर्षीची मोहन वाघ आणि प्रभाकर पणशीकर यांनी एकत्रितपणे “मदनाची मंजिरी’ या नाटकाची निर्मिती केली. या नाटकातील मंजिरीची भूमिका फय्याज यांनी साकारली आणि मग हा यशाचा सिलसिला सुरू झाला. “अश्रूंची झाली फुले’ मधली नीलम आणि काही वर्षांनंतर त्याच नाटकातील सुमित्रा या दोन भूमिकाही दीदींनी साकारल्या. याशिवाय “वीज म्हणाली धरतीला’मधील जुलेखा ही त्यांची भूमिका तर खूपच गाजली. “तो मी नव्हेच’, “मी मालक या देहाचा’, “अंधार माझा सोबती’, “कट्यार काळजात घुसली’ही “नाट्यसंपदे’ची आणि “पंडितराज जगन्नाथ’, “मत्स्यगंधा’, “संत गोरा कुंभार’, “बावनखणी’, “गुंतता हृदय हे’, “सूर राहू दे’ ही इतर संस्थांची नाटकेही त्यांनी आपल्या अभिनयाने आणि गायनाने गाजवली. त्या काळात “तो मी नव्हेच’चे हजार प्रयोग झाले होते. “अश्रूंची झाली फुले’चे ७०० ते ७५० प्रयोग झाले होते, तर “कट्यार’चे भारतभरात ५३५ प्रयोग झाले. “कट्यार’ हे त्या काळातले अतिशय गाजलेले नाटक. पुरुषोत्तम दारव्हेकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. वसंतराव देशपांडे या तीन दिग्गजांच्या प्रतिभेतून साकारलेल्या या नाटकात संवाद आणि संगीताची बहार होती. नाटकाची सुरवातच भैरवीने होत असे. त्यावेळी हा एक नवा प्रयोग होता. “या नाटकाने आणि त्यातील दिग्गजांनी मला खूप काही शिकवले,’ असे फय्याज सांगतात. “”गाणे किती गावे आणि कुठे संपवावे, हे बुवांनी (पं. जितेंद्र अभिषेकी) आम्हाला शिकवले. गाण्यातील भावना गळ्यात आणण्यासाठी ती भावना आठवायची आणि मग ते गळ्यातून व्यक्त करायचे, अशी बुवांची शिकवण होती. ती अंगीकारण्याचा मी कायमच जिवापाड प्रयत्न करायचे.” कोणतीही नवी गोष्ट शिकायची आणि ती स्वतःच्या शैलीत उतरवायची, अशी सवयच त्यांनी स्वतःला लावून घेतली. आज फय्याज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे वेगळेपण रसिकांना जाणवते ते बहुधा त्यामुळेच. “वेट अंटिल डार्क’ या चित्रपटावर बेतलेल्या “अंधार माझा सोबती’ या नाटकात ज्योती या अंध मुलीची भूमिका फय्याज यांनी केली होती. फय्याज यांच्या कारकिर्दीतील ही एक वेगळी भूमिका.
अभिनेत्री म्हणून या भूमिकेने त्यांना एक वेगळा आयाम दिला. या भूमिकेत फय्याज यांनी अक्षरशः जीव ओतला. भूमिका जगणे म्हणजे काय ते फय्याज यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आंधळ्या मुलीचे नेमके बेअरिंग यावे, तिचे जगणे कळावे यासाठी दिग्दर्शक कांती मडिया त्यांना रोज अंधशाळेत घेऊन जात. मग तिथून परतल्यावर डोळ्यावर पट्टी बांधून अभिनय करवून घेत. “”हा सराव करत असताना मी कितीतरी वेळा धडपडले. मार लागला, गुडघे फुटले; पण त्यामुळेच ती भूमिका मी समरसून साकारू शकले,” फय्याज सांगतात. “तो मी नव्हेच’मध्ये फय्याज यांनी साकारलेली चन्नक्का बघून पु. ल. देशपांडे यांनी त्यांना “वटवट’मध्ये भूमिका दिली. “”या नाटकात नाट्यसंगीत होते, लावणी होती आणि पुलंबरोबर एक द्वंद्वगीतही होते. पुलंमुळेही “पॉझ’ कसे घ्यायचे, “पंचेस’ कसे घ्यायचे, अशा अनेक नव्या गोष्टी शिकता आल्या, त्यांची भर मी माझ्या पुढच्या प्रत्येक कामामध्ये घालत राहिले,” असे फय्याज नोंदवतात. अभिनय आणि संगीत या दोन्ही क्षेत्रांमध्ये वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी, दारव्हेकर मास्तर या उत्तुंग माणसांनी फय्याज यांना घडवले. वसंतराव त्यांना कौतुकाने आपली लाडकी शिष्याच म्हणत असत. इतरही अनेक दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. मात्र कोणाचेही थेट अनुकरण करण्याचा मोह त्यांना कधी झाला नाही. “निर्गुणाचा संग धरिला जो आवडी’ किंवा “चार होत्या पक्षिणी त्या’ किंवा माडगूळकरांची “जोगिया’ ही फय्याज यांची गाणी इतर दिग्गज गायिकांइतकीच आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.
नृत्यकलाही जणू फय्याज यांच्या रक्तातच होती. वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या “संत तुकाराम’ आणि “होनाजी बाळा’ या दोन नाटकांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. या नाटकाचे नृत्यदिग्दर्शन गोपीकृष्ण यांनी केले होते. त्यात फय्याज यांच्या नृत्याला अर्थातच वाव होता. त्यांच्या अदाकारीवर गोपीकृष्ण यांची प्रतिक्रिया होती, “ही मुलगी एवढे चांगले नृत्य करू शकते, तर ते सोडून ती गाण्यातच का गुंतून पडली आहे?’ प्रत्येक काम त्या इतके जीव ओतून करायच्या, की त्या क्षेत्रातील माणसाला वाटायचे की फय्याज यांनी याच क्षेत्राला वाहून घेतले पाहिजे. फय्याज यांनी “महानंदा’, “पैंजण’, “एक उनाड दिवस’, “वजीर’ अशा काही वेगळ्या चित्रपटांमधूनही अभिनय केला. ऋषिकेश मुखर्जींच्या “सबसे बडा सुख’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती. याशिवाय “धरतीपुत्र’, “चॉंद का टुकडा’ अशा चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. “शेष रात्री’ या बंगाली चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर काम केले. इंग्रजीत स्क्रिप्ट लिहून घेऊन ते पाठ करून त्यांनी ही भूमिका साकारली होती. “बावर्ची’, “प्रेमपर्बत’, “आलाप’, “रंगबिरंगी’ या हिंदी चित्रपटांसाठी फय्याज यांनी पार्श्वगायनही केले. फय्याज यांना आपल्या समुहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.