अलिबाग,
राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यातील 6 योजनांसाठी 114 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे.
यातील अलिबाग तालुक्यातील काचली – पिटकीरी योजनेच्या बंधाऱ्याला गुरुवार (ता.28) विधीमंडळाच्या अंदाज समितीने भेट दिल्यावर खारभूमी विभागाचा गळथान कारभारावर सदस्यांनी खारभूमीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच झापले.

यावेळी संपत्प ग्रामस्थांनी खारभूमी विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे येथील पिकत्या भात शेतीची कशाप्रकारे वाट लागत आहे,तसेच ठेकेदार निकृष्ट दर्जाचा काम कर आहे याची वस्तुस्थिती समितीसमोर मांडली.
मागील दोन वर्षापासून 6 किलोमीटर लांबीच्या काचली – पिटकरी खारभूमी बंधाऱ्याचे काम सुरु आहे. या कामात अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी अनेकवेळा केलेली आहे.
शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र, या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याने येथील परिस्थितीमध्ये काहीही सुधारणा झालेली नव्हती.
आजही उधाणाचे पाणी थेट पिकत्या भातशेतीत शिरत आहे. आ. रणजीत कांबळे अध्यक्ष असलेली विधिमंडळाची अंदाज समिती रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.
बुधवारी अलिबाग येथे जिल्ह्यातील कामकाजाची चौकशी केल्यानंतर आज सकाळपासूनच या समितीने जिल्ह्यातील विविध कामांची प्रत्यक्ष पहाणी केली.
त्यांच्या ठरलेल्या कार्यक्रमाला बगल देत अंदाज समितीने काचली-पिकटरी खारभूमी योजनेला भेट दिली. यावेळी अंदाजे सत्तर गाड्यांचा ताफा होता.
अधिकारी, लोकप्रतिनीधी पहिल्यांदाच खारभूमीच्या बंधाऱ्यावर आले होते. यावेळी परिसरातील शेतकरीही मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी खारभूमीच्या अधिकाऱ्यांच्या गळथान कारभाराचा पाढाच समिती सदस्यांसमोर वाचत येथील शेती नापिक करण्यात अधिकाऱ्यांचा कशाप्रकारे सहभाग आहे, याचे सत्यकथन केले.
स्थितीचा अंदाज आल्याने समिती सदस्यही चांगलेच संतापले होते. त्यांनी खारभूमीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर धरत रखडलेल्या कामाचा आणि झालेल्या खर्चाचा जाब विचारला.
हे काम का रखडले आहे, याचा अहवालही अधिकाऱ्यांना अंदाज समितीकडे पाठवावा लागणार आहे. 6 किमी लांबीच्या काचळी – पिटकीरी खारभूमी योजनेसाठी 20 कोटी 59 लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यातून 334 हेक्टर जमीन पुन्हा पिकाखाली येईल असे खारभूमीचे अधिकारी सांगत आहेत.
त्याचबरोबर त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देताना खारजमीनीला समुद्राच्या खार्या पाण्यापासून संरक्षण मिळणार आहे.





















