चार जणांचा जागीच तर एका प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू

खोपोली (जि. रायगड) / प्रतिनिधी :- पुण्याकडून मुंबईकडे जाणारी इर्टीका कार (एम. एच.14 ईसी 3501) मुंबई पुणे द्रुतगती (एक्सप्रेस वे) महामार्गावर ढेकू गावाच्या हद्दीत किलोमीटर 37.00 येथे आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारची अज्ञात वाहनाला मागून धडक बसली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये चालकासह आठ प्रवासी असल्याचे सांगण्यात आले. हे सर्व प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईकडे जाण्यासाठी कारमधून प्रवास करीत होते. ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यामध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला किरकोळ जखमी झाली असून चार जणांना गंभीर इजा झाल्याने त्यांना एमजीएम रुग्णालय कामोठे येथे दाखल करण्यात आले आहे. या दरम्यान त्यातील एक जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. तसेच चालक आणि इतर दोघाजणांवर उपचार सुरू आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री 11 वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान हा अपघात झाला. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स, लोकमान्य रुग्णालय आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी यावेळी मदत कार्य केले. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला असून अपघाताची माहिती मिळताच खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खोपोली पोलीस निरीक्षक शिरीष पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले आदींनी चौकशी सुरू केली आहे.

* मयत :-
१) अब्दुल रहमान खान (३२ वर्षे) घाटकोपर.
२) अनिल सुनिल सानप.
३) वसीम साजिद काझी, रा.राजापूर, जि. रत्नागिरी.
४) राहुल कुमार पांडे (वय-३० वर्षे) फ्लॅट न.-६०५, रिद्धेश्वर हौ. सो. कामोठे, नवी मुंबई.
५) आशुतोष नवनाथ गांडेकर (२३ वर्षे).
५, अशोक धर्मा चाळ, म्हातारपाडा, अंबोली, अंधेरी(प), मुंबई.

* गंभीर जखमी :-
१) मच्छिंद्र आंबोरे (वय ३८ वर्ष) चालक.
२) अमीरउल्ला चौधरी.
३) दिपक खैराल.

* किरकोळ जखमी :-
१) अस्फीया रईस चौधरी (२५ वर्षे)
कुर्ला, मुंबई.