बालमजुरीच्या या समस्येला विरोध करण्यासाठी १२ जून हा दिवस ‘जागतिक बाल मजुरी विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जातो.आंतरराष्ट्रीय श्रम संगठन (आयएलओ)नुसार जगभरात २१ कोटीपेक्षा जास्त मुलांकडून बालमजुरी करून घेतल्या जाते. संपूर्ण जगातून ७१पेक्षा जास्त देशांत बालमजूरी होते. विकासशील देशांत बालमजूरीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. जागतिक पातळीवर विचार केल्यास भारतात बालकामगारांची संख्या खूप अधिक आहे.
आपल्या देशात १९८६ साली बालकामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा लागू करण्यात आला, पण या कायद्यात अनेक पळवाटा आहेत. एकीकडे १८ वर्षांखालील प्रत्येक व्यक्ती म्हणजे ‘मूल’ अशी व्याख्या केली जाते, प्रत्येक मुलाला शाळेतले औपचारिक शिक्षण मिळालेच पाहिजे, असेही सांगितले जाते. तर दुसरीकडे बालकामगार कायद्यानुसार फक्त १४ वर्षांखालील मुलाला कामावर ठेवणाऱ्या व्यक्तींवरच कारवाई करण्याची तरतूद आहे. भारतात अंदाजे दीड कोटी मुलं बालमजुरी करत आहेत. विडी कारखाने, बांगडय़ांचे कारखाने, हॉटेल्स, खाणावळी, तयार कपडे शिवणारे कारखाने अशा अनेक ठिकाणी आपण बालमजूर पाहतो.