जन्म. १२ ऑक्टोबर १९११ मुंबई येथे.
विजय मर्चंट हे दुस-या महायुद्धाच्या अलीकडे-पलीकडे भारताचे प्रमुख फलंदाज होते.
विजय मर्चंट यांनी जेव्हा बॅट हातात धरली तेव्हा म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी प्रथम वर्गाचे सामने खेळायला प्रारंभ केला. मुंबई हीच त्यांची कर्मभूमी असल्याने मुंबईकडून त्यांना अर्थातच संधी मिळाली. १९२९ ते १९५१ या दरम्यान ते खेळले, पण काही ना काही कारणाने त्यांना कसोटी सामन्यांमध्ये फार खेळायला मिळाले नाही. अवघ्या दहा कसोटी सामन्यांची त्यांची कारकीर्द. तरीही त्यांची छाप क्रिकेटवर जी पडली ती कधीही न पुसता येण्याजोगी आहे. एकूण दहा क्रिकेट कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ८५९ धावा केल्या. पहिल्या वर्गाच्या सामन्यांमध्ये त्यांनी केलेल्या धावा आहेत १३ हजार ४७०. तीन शतके आणि तीन अर्धशतके कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी झळकवली. पहिल्या वर्गाच्या सामन्यांमध्ये त्यांची सरासरी होती ७१.६४. देशांतर्गत सामन्यांवर त्यांनी आपली छाप पाडली होती, पण त्याही आधी ते आंतरशालेय क्रिकेटमध्ये अतिशय अग्रभागी तळपणारे असे नाव होते. डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर त्या काळात सर्वप्रथम विजय मर्चंट यांचेच नाव घेतले जात असे. त्यांनी महाविद्यालयीन क्रिकेटवरही आपला ठसा उमटवला होता. त्यांचे नाव सिडनहॅम महाविद्यालयाच्या संघातूनच सर्वप्रथम झळकू लागले. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी केलेल्या इंग्लंडच्या दोन दौऱ्यांचा उल्लेख केला जातो. तिथल्या त्यांचा झंझावात पाहून त्यांची निवड हिंदू संघाकडून करण्यात आली. चौरंगी आणि पंचरंगी सामने ही त्या काळाची देणगीच होती. १९३१ मध्ये त्यांनी आंतरमहाविद्यालयीन सामन्यांमध्ये ५०४ धावा फडकवल्या आणि २९ बळी घेतले. बॉम्बे जिमखान्यावर भारतात आलेल्या इंग्लिश संघाविरुद्ध ते खेळले आणि या देशाच्या भूमीवर खेळली गेलेली ती पहिली कसोटी ठरली. त्या काळाचे आणखी एक भूषण होते विजय हजारे. मुंबई पंचरंगी सामन्यामध्ये त्यांनी हजारे यांचा २४२ धावांचा उच्चांक तेव्हा मोडला होता. त्या आधीच्या मुस्लिम संघाविरुद्धच्या सामन्यामध्ये मर्चंट यांनी झंझावाती अडीचशे धावा केल्या होत्या. हजारे यांनी त्यानंतरच्या सामन्यामध्ये ३०९ धावा केल्या आणि त्यांना उत्तर दिले. विशेष हे की त्यांच्या या धावा त्यांच्या संघाच्या एकूण ३८७ धावांपैकी होत्या. महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी करंडकाच्या सामन्यामध्ये मुंबईकडून खेळताना मर्चंट यांनी ३५९ ही उच्चांकी धावसंख्या नोंदवली होती. मर्चंट अस्सल मुंबईकर होते आणि त्यांना मुंबईचा प्रचंड अभिमान होता. त्यांना फार कसोटी सामने खेळायला मिळाले नाहीत. अठरा वर्षांची कारकीर्द आणि त्यांच्या वाटय़ाला आले केवळ दहा कसोटी सामने. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेच जात नव्हते त्याचा हा परिणाम होता. त्यांना एकदा ऑस्ट्रेलियाच्या आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्याला मुकावे लागले. ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या भारतीय संघाचे कर्णधार म्हणून त्यांची १९४७-४८ मध्ये निवड झाली होती, पण त्यांना संघातल्या खेळाडूंची निवड मान्य नसल्याने त्यांनी तेव्हा दौऱ्यावर न जायचा निर्णय केला असेही सांगितले जाते. इंग्लंडविरुद्ध दिल्लीत खेळल्या गेलेल्या त्यांच्या शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये त्यांनी झळकवलेल्या १५४ धावा या त्यांच्या सर्वाधिक धावा होत. त्यांच्या फलंदाजी करण्याच्या पद्धतीवर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ट्रेव्हर बेली अतिशय खूष असे. क्षेत्ररक्षण करताना त्यांच्या खांद्यास झालेल्या दुखापतीने त्यांना त्यानंतरच्या सामन्यांमध्ये बाजूला ठेवले गेले. त्यानंतरच्या काळात ते क्रिकेटचे समीक्षक बनले, प्रशासक बनले आणि अपंग, अंध व्यक्तींचे ते प्रतिनिधीही बनले. भारतीय क्रिकेट निवड समितीचे ते अध्यक्ष बनले आणि त्यांनी क्रिकेटचा चेहरामोहराच बदलवून टाकला. १९७१ मध्ये त्यांनी आपल्या मताधिकाराचा वापर करून ‘टायगर’ पतौडीच्या नवाबाला वेस्ट इंडिजला जाणाऱ्या संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकले. विविध भारतीवरील त्यांचा ‘क्रिकेट वुईथ विजय मर्चंट’ हा मफतलाल मिल्सचा प्रायोजित कार्यक्रम त्या काळी खूप गाजला होता. विजय मर्चंट यांचे निधन २७ एप्रिल १९८७ रोजी झाले.