अलिबाग

थोर संतश्रेष्ठ सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या अवधूत सांप्रदायाचा रायगड जिल्ह्यात प्रचार करणारे गुरूवर्य सुभानराव तथा अण्णा राणे यांची ४० वी पुण्यतिथी मंगळवार १९ एप्रिल २०२२ रोजी रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातील श्रीदत्त मंदिर सभागृह पेझारी येथे साजरी झाली. याप्रसंगी आयोजित भव्यदिव्य सन्मान सोहळ्यात सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल समाजसेविका जिविता पाटील कुसुंबळे यांना जिल्हा परिषद सदस्या, महिला बालकल्याण कमिटी सदस्या तसेच झेप फाऊंडेशन अध्यक्षा चित्रा पाटील यांच्या शुभहस्ते गुरूवर्य सुभानराव राणे पुरस्कार प्रदान करून
सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.

यावेळी श्रीपंत भक्त मंडळ संचलित गुरुवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठान पेझारी अध्यक्ष दिगंबर सुभानराव राणे, खासदार अरविंद सावंत, रा.रा. रघुजीराजे आंग्रे, परमपूज्य रंजन पंतबाळेकुंद्री, प.पू. अभिजित पंतबाळेकुंद्री, भजनरत्न महादेवबुवा शहाबाजकर, पंडित अरुणबुवा कारेकर, शंकर राव म्हात्रे, दीप्ती राणे, ऋचा जुईकर, आदित्य कडू इ. मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आयोजित कार्यक्रमात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील ४५ जणांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

जिविता पाटील यांनी वयाच्या अवघ्या २१ वर्षाची असताना पतीच्या निधनानंतर एका वर्षाच्या मुलाचा सांभाळ करून येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करीत तुटपुंज्या मानधनावर अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत असताना एम. ए.बी.एड, एम.एस.डब्ल्यु, एम. ए.एज्युकेशन, एल.एल.बी अशा उच्च पदव्युत्तर पदव्या प्रथम श्रेणीत प्राप्त करून शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवून एक मानाचे स्थान प्राप्त केले. तसेच साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त केले.

त्यांचा भास आभास हा चारोळी संग्रह, काव्यकुंज हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच “ती” चे अस्तित्व हा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

समाजकार्याची विशेष आवड जोपासत असताना तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन ची स्थापना केली. अनेक मुलींना खास करून आदिवासी मुलींना शिक्षणासाठी मार्गदर्शन केले व मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले.

महाड पोलादपूर आपत्तीग्रस्तांना समाजातील दात्यांच्या सहकार्याने तत्काळ मदतकार्य पोहोचविले. जीवाची पर्वा न करता गरजवंतांना तसेच कोरोनाग्रस्तांना सेवा पुरविण्याचे इतकेच नव्हे तर 54 कोरोना ग्रस्त लोकांना स्वतःची आर्थिक परिस्थिती नसताना वेळप्रसंगी स्वत:चे दागिने गहाण टाकून मोफत जेवणाचे डब्बे पोहोचविण्याचे काम जिवीता पाटील यांनी केले.

त्यांच्या याच कार्याची दखल घेत दिगंबर राणे यांच्या श्रीपंत भक्त मंडळ पेझारी यांनी त्यांना मानाचा समजला जाणारा गुरुवर्य सुभानराव राणे पुरस्कार देऊन सन्मानित केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन दीनानाथ कडू यांनी केले.