जन्म.१४ एप्रिल
मराठी अभिनयसृष्टीत आपल्या निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अंगद म्हसकर गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून अभिनयक्षेत्रात काम करत आहेत.
अनेक दर्जेदार नाटकं, मालिका व चित्रपटातून आपल्या लक्षवेधी अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता अंगद काशिनाथ म्हसकर नेहमीच अपेक्षांवर खरा उतरतो.
वयाच्या २० व्या वर्षापासून कॉलेजमध्ये असताना त्यांनी एकांकिका केल्या, त्यांच्या दिग्दर्शनात हातभार लावला.
अंगद यांचे वडील उत्तम तबलावादक आणि गायक होते. पणजोबा कीर्तनकार होते. परंतु त्यांनी व्यवसायासाठी कधी कलेचा वापर केला नाही, केवळ आवड म्हणून ती कला जोपासली होती.
आपल्या मित्रांबरोबर एकांकिकेत भाग घेतला आणि तेव्हापासून आपण या क्षेत्रात काम करावे याबद्दल जाणीव निर्माण झाली, असे अंगद सांगतात.२००० साला पासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात ठाण्यातील चिरंतन कला मंच संस्थेतर्फे होणाऱ्या एकांकिका स्पर्धेत ते भाग घेत होते. इ टीव्ही मराठी या वाहिनीवरील नितिन चंद्रकांत देसाई निर्मित ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेतून श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या भूमिकेने अंगद यांची अभिनयसृष्टीत तसेच प्रेक्षकांमध्ये खऱ्या अर्थाने ओळख निर्माण झाली. श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या मालिकेतील बाजीराव पेशवे यांच्या पात्राने त्यांच्या अभिनयातील कारकिर्दीला विशेष वळण दिले. पुढील काळात त्यांनी अनेक मालिका केल्या.
ती फुलराणी, रणांगण, ऑल दि बेस्ट, बुढा होगा तेरा बाप,इत्यादी नाटकं,वादळवाट”,कुलवधू”,सप्तपदी,श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी”,गुंतता हृदय हे”, इत्यादी मालिका व लोकमान्य, मुंबई पुणे मुंबई २, बालगंधर्व तसेच सविता दामोदर परांजपे या चित्रपटातून काम केले आहे.
अंगद म्हसकर यांना २०१० साली पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानीतही करण्यात आले आहे. तसेच त्यांना आय.एन. टी. मध्ये ३ वर्षे सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता म्हणून त्यांना गौरवण्यात आलं.
बालगंधर्व या चित्रपटात अंगद यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप रसिक मनावर पाडली आहे.
प्रसिद्धीच्या झोतात आणणाऱ्या त्यांच्या राऊ भूमिकेला अनुसरूनच श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या टोपण नावावरून त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘राऊ’ असे ठेवले आहे.